कालिदास
संस्कृत भाषेतील प्रसिद्ध कवी आणि नाटककार / From Wikipedia, the free encyclopedia
महाकवी कालिदास हे एक शास्त्रीय संस्कृत लेखक होते, त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत . [1] कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो. त्यांना भारताचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाते.
संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना प्रेरणादायी ठरले आहे. महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे. आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी कालिदासप्रेमी नागपूर जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात.
सर्वच सौंदर्यप्रेमी, कलाप्रेमी, कवी, नाटककार, संस्कृत भाषेचेचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासांविषयी अतिउच्च प्रेम, आदरभाव आणि त्यांच्या साहित्यनिर्मितीविषयी उत्सुकता असते. जगातील कोणताही वाचक कोणत्याही भाषेत एकदा कालिदासांची साहित्यकृती हाती घेतली की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवीत नाही. अशा जगभर प्रसिद्ध असलेले महाकवी, महान नाटककार कालिदास यांच्या 'मेघदूता’मुळे त्यांची आषाढाच्या पहिल्या दिवशी आठवण होतेच होते.