रवींद्रनाथ टागोर
कवी, साहित्यिक, तत्त्वज्ञ / From Wikipedia, the free encyclopedia
रवींद्रनाथ टागोर (बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार: रोबीन्द्रनाथ ठाकूर) (मे ७, १८६१ - ऑगस्ट ७, १९४१), ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते.[2][3] १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला.
रवींद्रनाथ टागोर | |
---|---|
जन्म नाव | रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर |
टोपणनाव | गुरूदेव |
जन्म |
मे ७, १८६१ कोलकाता, भारत |
मृत्यू |
७ ऑगस्ट, १९४१ (वय ८०) कोलकाता, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, नाटक |
भाषा | बंगाली |
साहित्य प्रकार | कविता, नाटक |
प्रसिद्ध साहित्यकृती | जन गण मन, गीतांजली |
प्रभावित | द.रा. बेंद्रे, पु.ल. देशपांडे |
वडील | देवेंद्रनाथ टागोर |
आई | सरला देवी |
पत्नी | |
पुरस्कार | साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१३)[1] |
स्वाक्षरी |
अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन "अगदी संवेदनशील, ताजे आणि सुंदर" कविता असे केले जाते. ते १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले.[4] टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक आणि पारंपारिक म्हणून पाहिले गेले; तथापि, त्यांचे "सुंदर गद्य आणि जादुई कविता" बंगालबाहेर फारसे ज्ञात नाहीत.[5]
बंगाली साहित्यावर रवीन्द्रनाथांचा एवढा प्रभाव लक्षात आहे की, बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते. त्यांना कधीकधी "बंगालचा बार्ड" म्हणून संबोधले जाते.[6] तसेच ते अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते.
कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली.[7] वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. १८७७ पर्यंत त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला.[8][9]
शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झाले.[10]